बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Saturday 28 February 2015

रुक्मिणीच्या निमित्ताने

२०१३ च्या मौजेच्या दिवाळी अंकातला अरुणा ढेरेंचा 'रुक्मिणी' बद्दलचा ललित लेख काल वाचला. लेखात त्यांनी तिचे, तिच्या आयुष्याचे - आयुष्यात घडलेल्या मुख्य घटनांचे विश्लेषण, अवलोकन केले आहे. अर्थात खूप सुरेख ओघवते लिखाण आहे. हे लिखाण त्यांनी वाचलेल्या पुस्तकांचे संदर्भ देते त्याचबरोबर त्यांच्या भटकंती दरम्यान त्यांनी ऐकलेल्या कथा/दंतकथांचे पण संदर्भ देते. काही ठिकाणी त्यांनी जाणून बुजून 'रुक्मिणी' विषयी इतर बायांशी साधलेल्या संवादातून पुढे आलेली माहितीपण येते. असे हे रुक्मिणीच्या आयुष्याचे मोजमाप आहे ती सोडून इतर अनेकांच्या तराजूने तोललेले. अर्थात इथे लेखाचा मुख्य विषय रुक्मिणी असल्याने  तिचे म्हणणे काय आहे हे जाणून घेणे शक्य नव्हतेच.

पण हे असे कितीतरीवेळा आपल्या अनुभवासही येते. तुमच्या आयुष्यातली एखादी घटना, महत्वाची किंवा अगदी छोट्यात छोटी, कुठून कुणाच्या ऐकण्यात येते. ती व्यक्ती तिच्या आकलन क्षमतेनुसार, तिच्या स्वतःच्या वैचारिक बंधनांच्या तराजूत तोलून त्यावर स्वताचे एक मत तयार करते आणि अर्थात पुढे तुम्हाला माहितीहि नसलेला एक नवाच पैलू (?) तुमच्या व्यक्तिमत्वाला जोडला जातो. त्याला पुन्हा त्या व्यक्तीची त्या-त्या वेळेची मानसिक गरज, तुमच्या बद्दल मनात असलेल्या भाव-भावना यांचे एक आवरण पण चढवलेले असतेच. कधीकधी मग हे काल्पनिक जोड तुमच्या नकळत कायमस्वरूपीच बिलगून बसतात.

कधी या सगळयाची मजा वाटते, कधी राग येतो तर कधी खूप उदास व्हायला होते. मग कधीतरी असे काही वाचण्यात आले कि नुसतेच गालातल्या गालात हसू येते आणि आपलेच आपल्याला काहीतरी उमजून उगीचच हलके वाटते ..... :)

Thursday 19 February 2015

अस्वस्थ आठवणी १ - 'ऑफिस बॉय'.

काही व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप थोड्या काळासाठी येतात. पण जेंव्हा जेंव्हा आठवतात तेंव्हा तेंव्हा जीव अगदी कासावीस करून जातात. त्यातलाच हा एक.

शिक्षण संपल्यावरच्या माझ्या पहिल्याच नोकरीच्या ठीकाणी तो 'ऑफिस बॉय' म्हणून कामाला होता. सगळ्या ऑफिसभर फटाफटा स्लीपर वाजवत चालायचा, धपाधपा पाय आपटत जिने उतरायचा आणि मान तिरकी वर करून इकडून तिकडे यायचा जायचा. पहिल्यांदाच बघणाऱ्याला उद्धट वाटेल असेच त्याचे वावरणे असायचे.

पण तसा होता सज्जन. अर्थात हे आणि असे त्याचे गुण समजायला त्याच्याशी चांगली ओळख मात्र व्हावी लागायची. कामसू होता, काहीतरी नवीन शिकायचे असायचे, इकडच्या-तिकडच्या कार्यालयीन बातम्यांमधे त्याला कधीही रस नसायचा आणि तितकाच निरस तो अभ्यासाच्या बाबतीतही होता. १० वी नापास होऊन त्याने शिक्षण सोडलेलं होत. घरच्या परिस्थितीने त्याला नोकरी करण्याशिवाय दुसरा काही मार्गही ठेवला नव्हता.

एका खोलीचे घर आणि त्यात त्याचा जुळा मंदबुद्धी भाऊ, म्हातारी आई, एक अपंग बहिण आणि तो असे सगळे रहात होते. हलाखीची म्हणावी अशीच ती परिस्थिती. पण हा कधीही पैशांसाठी हपापलेला दिसला नाही कि कधी कुणापुढे हात पसरलेला आठवत नाही. इतकेच काय आपले रडगाणेही तो कधी कुणासमोर गात बसलेला मी बघितले नाही. इतर कुणाकुणाकडून ऐकून त्याची परिस्थिती समजली होती.

त्याची रोजची कामं ठरलेली होती आणि त्याव्यतिरिक्त त्याने 'सांग'कामं करणे अपेक्षित होते. पण ठरलेली कामं झाल्याशिवाय तो कुणाचेही कुठलेही काम करतच नसे. एका वरिष्ठ मैत्रिणीने अनेक वेळा त्याला समजावूनही त्याच्या डोक्यात काही ते क्रमाची अदलाबदल करण्याचे कधी शिरलेच नाही. रविवारी तर 'आज आपला मूड बरोबर नाही, आपल्याला जास्त काही काम सांगायचे नाही' असे तो आल्याआल्याच जाहीर करत असे. आणि एरवी रिकामा वेळ मिळाल्यावर जसं तो खिडकीतून एकटक रस्त्याकडे बघत बसायचा तसाच थोडावेळ बसून रहात असे. [इथे कार्यालयीन सुट्टीचा वार गुरुवार होता]

रोज न चुकता 'सामना' वाचणे हा त्याचा छंद आणि  'बाळासाहेब' हा त्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी लिहिलेला आणि त्यांच्याबद्दल लिहून आलेला शब्द न शब्द याला पाठ असे. एकदा असेच सकाळी सकाळी 'मुड' नसल्याची दवंडी ऐकू आली. आम्ही सगळयांनी नेहमीप्रमाणेच हसण्यावारी नेले. थोड्यावेळाने तो माझ्या त्या वरिष्ठ मैत्रिणीकडे गेला आणि अगदी रडवेल्या आवाजात विचारले,  'बायपास' म्हणजे काय हो ? तिने आपले चेष्टेच्याच मूड मध्ये सांगितले, 'अरे माणसाचे हृदय काढून सशाचे हृदय लावतात त्याला बायपास म्हणतात'

याच्या डोळ्यात एकदम पाणीच आले. 'अरे झाले काय ते तरी सांग' असे म्हंटल्यावर याने सांगितले 'अहो बाळासाहेबांची बायपास करणार आहेत. आता तुम्हीच सांगा वाघासारख्या माणसाला सशाच हृदय लावलं तर तो जिवंत कसा रहाणार' बाळासाहेबांची बायपास करणार असल्याची बातमी याने सामना मध्ये वाचली होती आणि त्यामुळे याच चित्त थाऱ्यावर नव्हतं.

मी नोकरी सोडल्यावर पुन्हा कधीच त्याची भेट झाली नाही. एखाद्या मैत्रिणीकडून त्याचे लग्न झाले, मुलगा झाला अशी खुशाली मात्र कळायची. पुढे त्याने पण ती नोकरी सोडली. मग काहीच कळेनासे झाले. तोपर्यंत खरं म्हणजे मलाही विसर पडला होता. आणि मग एकदम बातमी आली. कर्वेरोडवर त्याच्या सायकलला अपघात होऊन तो जागेवरच खलास झाला. 

क्षणात माझ्याडोळ्यासमोर दिसली ती त्याची कधीही न बघितलेली वयस्कर आई, अपंग बहिण, मंदबुद्धी भाऊ, एक अजाण लेकरू आणि ती दुर्दैवी बायको. कुठून बळ आणणार होती हे संकट, ही जबाबदारी पेलण्याच कुणास ठाऊक.

- आरती.