बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Monday 2 March 2015

मर्यादा (?)

आम्ही लहान असताना श्रीरामपुरला दरवर्षी सर्कस यायची. कॉलनीतल्या एक कोणीतरी काकू सगळ्यांच्या पोरांना नेऊन सर्कस दाखवून आणायच्या. दिवसा उजेडी चालू होईल आणि उजेड असेपर्यंतच संपेल असा एखादा खेळ निवडलेला असायचा.

आवारात पोहोचल्या बरोबर तंबूच्या डाव्या बाजूला ठेवलेले प्राणी जास्तीत जास्त जवळ जाऊन बघायची खूप घाई असायची तेंव्हा. वाघ-सिंह पिंजऱ्यात आणि हत्ती-घोडे साखळीने-दोरखंडाने बांधलेले.

वाघ-सिंह पिंजऱ्यातून बाहेर आले तर !!?? तो एवढा मोठ्ठा हत्ती सुटला तर !!?? अशी आमची चर्चा चाले. पण, एवढा मोठा ताकदवान हत्ती इतक्या छोट्याश्या साखळीला बांधला आहे, जी तोडणे त्याच्यासाठी अगदीच सहज शक्य आहे, आणि तरीही ती न तोडता तो शांत उभा आहे. हे काही तेंव्हा लक्षात आले नाही.

पुढे कधीतरी कोणाकडून तरी एक गोष्ट ऐकली. हत्तीच्या पिल्लाला म्हणे लहानपणापासूनच, त्याची ताकद अगदीच कमी असल्यापासून साखळीला बांधून ठेवतात. सुरुवातीला तो ती तोडायचा प्रयत्न करतो पण त्याला ते शक्य होत नाही. त्याच्या मनावर हे पक्के ठसले जाते कि हि साखळी तोडून टाकणे आपल्याला शक्य नाही. त्यामुळे कितीही मोठा झाला तरी एकदा साखळी बांधली कि हत्ती अगदी शांतपणे बांधलेल्या अवस्थेत तसाच उभा रहातो.

पर्वा असेच एका मैत्रिणीशी बोलताना हि गोष्ट पुन्हा आठवली.

नोकरीच्या निमित्ताने पुण्यात येऊन मला २ वर्ष होऊन गेली होती. बऱ्याच ओळखी झाल्या होत्या. एक छोटा ग्रुप मिळाला होता. आम्ही काही मित्र-मैत्रिणी एकत्र कार्यक्रम वगैरे बघायला जायचो. एकदा एका मैत्रिणीने विचारले,
'असा-असा कार्यक्रम आहे येतेस का ?'
'कधी, कुठे ?' - मी.
'रात्री ९ चा आहे, टिळक स्मारकला .'- ती.
'मी नाही जात अग इतक्या उशिरा बाहेर' - मी.

माझे हे उत्तर तिने ऐकले आणि मग माझे छोटेसे बौद्धिकच घेतले.

'जात नाहीस हे कळाले, पण का जात नाहीस ?' - ती.
'आग आमच्या घरी लहानपणापासून अशीच पद्धत आहे', - मी.

'बर ठीक आहे, चांगली पद्धत आहे हि. पण तुमचे गाव लहान होते, तुम्ही मुली-मुलीच होत्या, वगैरे वगैरे वगैरे. म्हणून कदाचित तुमच्या घरी तशी पद्धत असेल. पण इथे पुण्यात उशिरा बाहेर जाणे सुरक्षित आहे, शिवाय आम्ही तुला घरापर्यंत सोडायला तयार आहोत मग काय हरकत आहे यायला ?.

बदलत्या परिस्थिती प्रमाणे सवयी बदलाव्या अग. निदान तेंव्हा ते तसे का होते, याची कारणं शोधून, आत्ता या परीस्थीतीत ती खरच तशीच्या तशी लागू होतात का, हे बघायला काय हरकत आहे ?

नुसतेच 'नाही' म्हंटल्याने होणार काय आहे तर, तुझा एक चांगला कार्यक्रम बघायचा राहून जाणार आहे. कधी कधी आपली आपणच स्वत:ला इतकी बंधन घालतो, आणि आयुष्य त्यातच अडकून पडते.' - ती.

'हम्म्म्म .... ' - मी.

मनातल्या मनात मात्र हत्तीची गोष्ट आठवत होती.

त्यादिवशी मी नाही गेले. पण नंतर काही दिवसांनी, माझ्या घराजवळच पाताळेश्वराच्या मंदिरात त्रिपुरी पोर्णिमे निमित्त 'पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा' कार्यक्रम होता. मी जाणार होते. संध्याकाळी अचानक तीच मैत्रीण दारात.

'काय करते आहेस ?'-ती.
'काही नाही, कार्यक्रमाला निघाले होते'-मी.
'बाहेर सगळेजण आले आहेत, आम्ही पण येतो तुझ्याबरोबर' -ती.
'अरे व्वा ... !!'-मी.

मी तिच्या बरोबर बाहेर आले. सगळा ग्रुप मंदिराकडे निघाला. तिथेच बाहेर सगळ्यांनी गाड्या लावल्या होत्या. तिथे पोहोचल्या बरोबर सगळे आपापल्या गाड्या काढायला लागले. मी म्हंटले, 'काय रे कार्यक्रम नाही बघायचा का ?'

सगळ्यांनी एका सुरात उत्तर दिले 'नाही, आपण Jackie Chan चा चित्रपट बघायला चाललो आहोत, अलकाला'.

गुपचूप गेले त्यांच्या बरोबर. बाहेरच कुठेतरी खाल्ले-पिल्ले, चित्रपट बघितला आणि रात्री १२ ला वगैरे घरी आले.

नंतर बरेच दिवस सगळे मलाच चिडवत होते, 'काय हे, बाळासाहेबांचा कार्यक्रम सोडून Jackie Chan' :) :)

मग चिक्कार फिरले, पुणे आणि आसपास. भरपूर कार्यक्रम/नाटकं/चित्रपट बघितले. रात्रीचे ट्रेक केले. मजेत गेले ते सगळे दिवस. पण हा प्रसंग आठवला कि अजूनही माझी मलाच मजा वाटते.

असा मित्र-मैत्रिणींचा उपयोग होतो फारफार
अबकी बार मोदीसरकार ..... :)

(हे लिहिले तेंव्हा मोदी सरकार येण्याच्या मार्गावर होते)