बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Sunday, 13 March 2016

'रानबखर'

[ही बखर आहे, इतिहास नाही. पक्षधराने लिहिलेल्या घडल्या गोष्टीचेच हे कवन आहे. स्वत: रानात असताना आणि रानसख्यांवर लिहिली, म्हणून ही रानबखर.]
----------------------------------------------------------------------------------------------------
जानेवारी २०१४ ला हे पुस्तक प्रकाशित झाले. लगेच वाचायचे ठरवूनही विकत घ्यायलाच मे २०१५ उगवला आणि वाचायला मार्च २०१६. तर ही बखर मुख्यतः लक्षात राहते ती आदिवासींवर झालेल्या अन्यायाची कहाणी म्हणून, पण ती त्यापुरतीच मर्यादित नक्कीच नाहीये. समस्या मांडल्या आहेत पण त्यांची उत्तरं पण सुचवली आहेत. मिलिंद थत्ते स्वतः गेली अनेक वर्षे या लोकांबरोबर वास्तव्य करून आहेत त्यामुळे विचारप्रक्रिये मधुन डोकावणारे आणि जाणिवपूर्वक सुचवलेले सगळेच पर्याय पटण्याजोगे आहेत.
.
पुस्तकाच्या सुरुवातीला आदिवासींच्या आयुष्याची अगदी जवळून ओळख करून दिली आहे. त्यांचे जंगलाशी असलेले नाते, त्यांचे परस्परावलंबित्व, पर्यावरण प्रणालीत असलेले त्यांचे मुख्य स्थान, जंगलाभोवती वसलेलं त्याचं जग आणि त्यांची जीवनपद्धती. हे सांगत असतानाच त्यांची अल्पसंतुष्ट वृत्ती, कधी परिस्थितीशी सहज जमवून घेणारे तर कधी परिस्थितीवर लीलया मात करणारे असे त्यांच्या आयुष्यातले बारकावे दाखवणारे अनेक प्रसंग आले आहेत. संदर्भाने एके ठिकाणी त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रसंगी करण्यात येणाऱ्या नाचांच्या प्रकारांच सवीस्तर वर्णन आलं आहे. अहाहा, अगदी लगेच उठून एखाद्या आदिवासी पाड्यावर चक्कर मारून यावी असं वाटायला लावणारं ते सगळ वर्णन आहे. अशी ही सगळी जीवनपद्धति विस्ताराने सांगीतल्याने पुढे मांडलेल्या समस्यांचं गांभीर्य थेट पोहोचलं आहे.
.
नक्षलवादाचा उगम आणि वाटचाल, आदिवासी लोकांची झालेली परवड आणि उध्वस्त झालेली आयुष्य, सरकार आणि संस्थांनी त्यांच्या तोंडाला पुसलेली पानं आणि केलेली फसवणूक, याची अनेक उदाहरणं पुस्तकात दिलेली आहेत. हे पुस्तक वाचण्याआधी "Reserve Forest" आणि "Buffer Zone" या शब्दांच कोण कौतुक होतं मला. पण हे सगळं वाचताना त्याचा नेमका अर्थ, हेतू आणि परिणाम समजले आणि डोळेच उघडले. ज्यांना वनबंदी करण्यात आली किंवा ज्यांची जमीन गेली, त्यांनी नक्की काय भोगलं ते असं लांबून पुस्तक वाचून समजेलच अस नाही पण या पुस्तकात अशी अनेक उदाहरणं आहेत जी अस्वस्थ, खूप अस्वस्थ करून गेली. त्यातलच हे एक, नन्हेरामच .... पूर्ण अबोल झालेल्या नन्हेरामने एकदाच तोंड उघडलं आणि म्हणाला "साहेब, त्या धरणाच्या पाण्यात मी जेंव्हा होडीतून जात असतो तेंव्हा तिथे पाण्याच्या मध्यावर मी थांबतो. मला दिसतं तिथे - तिथेच शेकडो फूट खाली माझ गाव आहे, घर आहे आणि शेतही आहे. आणि ते सगळ कायमचं हरपलं आहे, या जाणीवेने माझा ऊर फाटतो. ती वेदना मला सहन होत नाही."
.
मुंबईपासून सुरुवात करून सह्याद्री,सातपुड्याची सफर घडवत, बऱ्हाणपूरमार्गे मेळघाटातून छत्तीसगढ गाठून थेट झारखंड पर्यंत फिरवून आणताना वाटेत भेटणारी जंगलं-नद्या आणि त्यांच्या आश्रयाने विसावलेल्या विविध आदिवासी जमातींची माहिती इतकी सहज सोप्प्या भाषेत दिली आहे की डोळ्यापुढे नकाशाच उभा राहतो. 
.
पुस्तकातली भाषा ही 'पुस्तकी' अजिबातच नाही. रोखठोक बोली भाषा आहे. आणि त्यामुळेच अगदी समोर बसून एखाद्या हाडाच्या कार्यकर्त्याने त्याची तळमळ / तळतळ आपल्या समोर मांडवी आणि आपण अस्वस्थपणे ऐकावी, असा काहीसा हा अनुभव आहे. 
.
बाकी सरकारी यंत्रणा आणि संबंधित संस्था यांच्या 'कारभाराची' नुसती वर्णन वाचूनच माझे पाय गळाले. तर त्या सगळ्याचा इतक्या जवळून आणि वारंवार अनुभव घेऊनही खंबीरपणे उभं असलेल्या आणि इतरांना उभं रहाण्यास प्रोत्साहन देणाऱ्या 'वयम्' ( Vayam ) टीमला सलाम. 
.
आवर्जून वाचा.
.
रानबखर - मिलिंद थत्ते. 
समकालीन प्रकाशन.
पृष्ठे - ९५.
किंमत - १०० रुपये.


--------------------------
'वयम्' ही मिलिंद थत्ते यांनी स्थापन केलेली सामाजीक संस्था आहे. त्यांचे सगळे काम या संस्थेमार्फतच चालते. वयम् चे वैशीष्ठ्य म्हणजे त्यंच्याबरोबर काम करणारे बहुसंख्य कर्यकर्ते हे चळवळीतुन तयार केलेले / झालेले 'स्थानिक' कार्यकर्ते आहेत. 
वयमच्या फेसबुक पानाची लिंक :
https://www.facebook.com/VayamIndia/
---------------------------
पुस्तक बुकगंगावर उपलब्ध आहे.
http://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=%E0%A4%B0%E0%...


Wednesday, 5 August 2015

ब्लाउसी लेक.

एका गावात एक निळ्या डोळ्यांची सुंदर मुलगी रहात होती. तिचा प्रियकरही त्याच गावात रहात असे. गावाजवळच्या एका छोट्या तळ्यावर ती त्याला भेटायला जायची. सूर्यास्तापासून ते अगदी चंद्राचे प्रतिबिंब त्या नितळ पाण्यात उमटे पर्यंत ती दोघे तिथेच असायची. असेच मजेत दिवस चालले होते. पण एके दिवशी काही वेगळेच घडले. पाय घसरून तो पडला. पडला तोच एका टोकदार दगडावर. डोक्याला मार लागला आणि सगळाच खेळ संपला.

ती अगदी सैरभैर झाली. जे घडल आहे त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. त्याच्या आठवणीनी व्याकूळ झालेली ती अजूनही रोज संध्याकाळी तळ्यावर जात होती. तळ्याच्या मध्यात बोट घेऊन जायची आणि तिथेच बसून ती आक्रोश करत रहायची. अशा कितीतरी रात्री गेल्या पण ती आपले दुख:त्या तळ्याला रोज सांगत राहिली. आणि एक दिवस नाका-तोंडात पाणी जाऊन गुदमरून मृत झालेले तिचे शरीर पाण्याच्या तळाशी सापडले. शेजारीच खचून रुतलेली ती बोटही.

तिच्या निळ्या डोळ्यांच्या स्पर्शाने तळ्याचे पाणी त्यादिवशी निळे झाले ते कायमचेच...........

तेच हे ब्लाउसी लेक. ब्लाऊ म्हणजे Blue म्हणजेच निळे. गर्द झाडीत वसलेले हे अगदी छोटेसे तळे आहे. आम्ही गेलो होतो तेंव्हा तिथल्या नावाड्याने आम्हाला वरील कथा सांगितली. खर सांगायचं तर त्याची सत्यासत्यता पडताळून पहावी असे वाटलेच नाही.

तर, स्वित्झर्लंडच्या सहलीत ईंटरलाकेनला भेट देणार असाल तर आवर्जून याचाही समावेश करावा असं हे ठिकाण आहे. आल्प्स पर्वतरांगाच्या आसपास आढळणाऱ्या जलाशयांमध्ये हे सगळ्यात देखणे आहे असे ऐकले. 'कांडेरगृंड' नावाच्या गावाजवळ 'कांडेर' नदीच्या खोऱ्यात एका विस्तीर्ण उद्यानाच्या साधारण मध्यावर हे तळे आहे. तळ्याच्या एका बाजूला प्रचंड उंचीचा एक कातळ आहे. निळे आणि संपूर्ण पारदर्शक असे पाणी, नितांत सुंदर परिसर, खच्चून भरलेले निसर्ग सौंदर्य, डोळ्यांसाठी पर्वणी ठरावी असे सगळे दृश्य आहे. वल्ह्याच्या एका छोट्याश्या बोट राईडची सोय आहे. बोटीच्या तळाला काच लावलेली आहे जेणेकरून तळ्याच्या मध्यभागी सुद्धा, जिथे खोली साधारण ४० फुट आहे, पाण्याच्या पारदर्षषकतेचा अनुभव घेता येतो आणि जलाशयाचा तळ अगदी स्पष्ट दिसतो. पलीकडेच लहान मुलांना खेळण्यासाठी 'प्ले एरीया' पण आहे. बसायला लाकडी बाक आहेत. ग्रीलची पण सोय आहे. तसे तळे निरखून बोट राईड ईत्यादीसाठी तास-दीडतास खूप झाला. पण एक पूर्ण दिवस तिथे घालवायला आवडावा असे हे ठिकाण नक्कीच आहे.

१५००० वर्षांपूर्वी तळ्याच्या मागच्या डोंगरावरून दरड कोसळल्याने खळगा तयार होऊन या तळ्याची निर्मिती झाली. जलाशयाच्या तळाशी जिवंत झरे आहेत त्यामुळे पाणी स्वच्छा आणि पिण्यास योग्य आहे. आश्चर्य म्हणजे भर हिवाळ्यातही तापमान जेंव्हा शून्याच्या कितीतरी खाली गेलेले असते तेंव्हाही या तळ्याचे पाणी गोठत नाही. या पाण्याचे तापमान वर्षभर ८ ते ९ डिगरी सेल्सिअस असे स्थिर रहाते. त्यामुळे यात रंगीबेरंगी मासे आणि बदकं वर्षभर वास्तव्याला असतात. (पर्यटकांना हे गोड्या पाण्यातले ताजे मासे मिळण्याची सोय शेजारच्या हॉटेल चालकाने केलेली आहे). तळ्यातले सगळे पाणी दर ८ दिवसांनी पूर्णपणे नव्याने येते, जुने वाहून जाते अशी अजून एक माहिती त्या नावाड्याने दिली.

एवढेसे ते तळे पण त्यातही देखणे छोटेखानी लाकडी पूल बांधलेले आहेत. तळ्याच्या संपूर्ण बाजूबाजूने 'वॉक वे' केलेला आहे. त्यावरून फेरफटका मारताना अजून काही बारकावे लक्षात येतात. पाण्यात तळाशी काही ओंडके, झाडांची खोडं पडलेली दिसतात. चौकशी केल्यावर समजले की ती तशीच २०० वर्षांहून अधिक काळ तिथेच पडून आहेत, अजिबात न कुजता, खराब न होता. हा त्या पाण्याचा अजून एक गुणधर्म. तळ्या भोवतीच्या या फेरफटक्यातच आपल्याला एक देखणे शिल्प दिसते. कुण्या शिल्पकाराने त्या 'निळ्या डोळ्यांच्या' मुलीची आठवण म्हणून तिचे दगडी शिल्प पाण्याच्या तळाशी बनवले आहे.

जुलै-ऑगस्ट या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये इथे बरीच गर्दी असते. पण आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गेलो होतो तेंव्हा हवा तर मस्त होतीच पण गर्दी अजिबातच नव्हती. अजून एखादाच ग्रुप तिथे आलेला होता. त्यामुळे थोडे सिझनच्या आधी गेले तर निवांतपणे तिथल्या सृष्टी सौदर्याची, शांततेची मजा घेता येऊ शकते. तळ्याच्या मागच्या बाजूने 'ट्रेक / ट्रेल' साठी पण मार्ग तयार केलेला आहे. आवड आणि सवड असल्यास तिकडेही एक फेरफटका मारता येतो.

उघडण्याच्या वेळा :
उन्हाळ्यात - सकाळी ९ ते संध्याकाळी ५,
हिवाळ्यात - सकाळी १० ते संध्याकाळी ५

१. झुरीकहून जायचे असल्यास,
स्वत:ची गाडी असल्यास साधारण २.३० तासांचा प्रवास आहे. अंतर १५० किमी.
ट्रेनने जायचे असल्यास ३ तासाचा प्रवास आहे. झुरिक मुख्य स्थानकावरून ट्रेन मिळेल Zurich - Spiez - Frutigen (इथे ट्रेन बदलावी लागते) - Kandergrund.
(झुरिकहून झरमॅटकडे जाणाऱ्यांनाही 'ब्लाउसी लेक' बघून पुढे जाता येऊ शकते.)

२. 'इंटरलाकेन' या लोकप्रिय पर्यटन स्थळापासूनही बस किंवा ट्रेनने ब्लाउसीला जाणे सहज शक्य आहे.
स्वतःची गाडी असल्यास ४५ मिनिटांचा प्रवास आहे. अंतर ४० किमी.
ट्रेनने जायचे असल्यास १.३० तासांचा प्रवास आहे. Interlaken Ost east - Spiez - Frutigen (इथे ट्रेन बदलावी लागते) - Kandergrund.

**********
काही फोटो ....
.
1_0.JPG
.
2_0.JPG
.
3_0.JPG
.
4_0.JPG
.
5_0.JPG
.
6_0.JPG
.
7_0.JPG
.
8_0.JPG
.
9_0.JPG
.
10_0.JPG
.
11_0.JPG
.
12_0.JPG
.
13.jpg

Tuesday, 7 July 2015

'स्विस आजी आणि भारतीय पदार्थ'

'मटकीची उसळ' मी कधी कुणाला शिकवेल अशी मी कधीच कल्पनाही केली नव्हती. पण आत्ताच वरच्या आजींना शिकवून आले.

आदल्या दिवशी त्या मला सांगून गेल्या होत्या की उद्या २ वाजता करूया. मी त्यांना रात्री मटकी भिजत घालायला आणि सकाळी एकदा पाणी बदलायला सांगितले. त्यांच्याकडे नसणारच असा विचार करून मी जाताना तिखट-मिठाचा डबा आणि एका छोट्या डबित गुळाचा खडा घेऊन गेले. पण आश्चर्य म्हणजे मी त्यांच्या घरात गेले तेंव्हा ओट्यावर सगळी जय्यत तयारी मांडलेली होती. त्यात मिठ, धणेपूड, जिरे, कडीलींब, गरम मसाला, तेल, हळद आणि खडा हिंग या सगळ्या वस्तू होत्या.

स्वयंपाकाची म्हणा किंवा खाण्यापिण्याची, मनापासून आवड असेल तर ती अशी यानात्या प्रकारे दिसतेच.

झाले असे की एक दिवस आजोबा रेवाला घेऊन गेले. जाताना म्हणाले तिला मी जेवायला घालतो एमिलिया बरोबर. आम्ही आज भाताचा एक प्रकार केला आहे. मग १० मिनिटांनी परत आले आणि म्हणाले तुम्ही सगळेच या जेवायला आज आजींनी सगळा शाकाहारी स्वयंपाक केला आहे.

मी मटकीची उसळ केली होती आणि गाजराचा हलवा. ते घेऊन आम्ही जेवायला गेलो. मटकीला त्यांनी 'स्मॉल बिन्स' म्हंटले आणि खूप आवडीने खाल्ले. कसे केले ते पण विचारले. मग त्यांनी केलेला तांदळाचा डोसा कसा मस्त कुरकुरीत झाला पण चवीला थोडा वेगळाच झाला, आजोबांनी केलेले फुलके कसे निट जमलेच नाहीत असे सगळे विषय झाले. त्यांच्याकडे असलेले भारतीय पाककृतींचे पुस्तक त्यांनी मला दाखवले वगैरे वगैरे.

भारतीय पदार्थ आणि त्यात वापरण्यात येणारे घटकपदार्थ याची त्यांना असलेली प्रचंड माहिती बघून मी आश्चर्यचकितच  झाले. त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, एकदा झुरिकमध्ये 'धर्मगुरूंची' कमतरता होती म्हणून भारतातून एकजणांना बोलावण्यात आले. झुरिकला येण्यासाठी त्यांची एक अट होती, 'भारतीय पदार्थ बनवून देणारा स्वयापाकी उपलब्ध करून देण्यात यावा.'  त्यावेळी स्वयंपाकाची आवड असलेल्या या आजींनी ती जबाबदारी स्वीकारली होती. आणि काही पाककृतींच्या पुस्तकांच्या मदतीने त्यांनी 'धर्मगुरूंची' मागणी पुर्ण केली होती. त्यावेळी त्यांना भारतीय अन्नपदार्थांची भरपूर माहिती तर मिळालीच पण त्यांना स्वतालाही ती पदार्थांची चव आवडली ती कायमचीच.

'दोस्यात छोटे आणि मोठे तांदूळ वापरलेले असतात' असे काही घोळ त्यांचे होतात पण शोधून वाचून विचारून दोघेही आवडीने भारतीय पदार्थ करून मज्जेत खातात याचे मला खूपच आश्चर्य आणि कौतुक वाटते. :)


Monday, 2 March 2015

मर्यादा (?)

आम्ही लहान असताना श्रीरामपुरला दरवर्षी सर्कस यायची. कॉलनीतल्या एक कोणीतरी काकू सगळ्यांच्या पोरांना नेऊन सर्कस दाखवून आणायच्या. दिवसा उजेडी चालू होईल आणि उजेड असेपर्यंतच संपेल असा एखादा खेळ निवडलेला असायचा.

आवारात पोहोचल्या बरोबर तंबूच्या डाव्या बाजूला ठेवलेले प्राणी जास्तीत जास्त जवळ जाऊन बघायची खूप घाई असायची तेंव्हा. वाघ-सिंह पिंजऱ्यात आणि हत्ती-घोडे साखळीने-दोरखंडाने बांधलेले.

वाघ-सिंह पिंजऱ्यातून बाहेर आले तर !!?? तो एवढा मोठ्ठा हत्ती सुटला तर !!?? अशी आमची चर्चा चाले. पण, एवढा मोठा ताकदवान हत्ती इतक्या छोट्याश्या साखळीला बांधला आहे, जी तोडणे त्याच्यासाठी अगदीच सहज शक्य आहे, आणि तरीही ती न तोडता तो शांत उभा आहे. हे काही तेंव्हा लक्षात आले नाही.

पुढे कधीतरी कोणाकडून तरी एक गोष्ट ऐकली. हत्तीच्या पिल्लाला म्हणे लहानपणापासूनच, त्याची ताकद अगदीच कमी असल्यापासून साखळीला बांधून ठेवतात. सुरुवातीला तो ती तोडायचा प्रयत्न करतो पण त्याला ते शक्य होत नाही. त्याच्या मनावर हे पक्के ठसले जाते कि हि साखळी तोडून टाकणे आपल्याला शक्य नाही. त्यामुळे कितीही मोठा झाला तरी एकदा साखळी बांधली कि हत्ती अगदी शांतपणे बांधलेल्या अवस्थेत तसाच उभा रहातो.

पर्वा असेच एका मैत्रिणीशी बोलताना हि गोष्ट पुन्हा आठवली.

नोकरीच्या निमित्ताने पुण्यात येऊन मला २ वर्ष होऊन गेली होती. बऱ्याच ओळखी झाल्या होत्या. एक छोटा ग्रुप मिळाला होता. आम्ही काही मित्र-मैत्रिणी एकत्र कार्यक्रम वगैरे बघायला जायचो. एकदा एका मैत्रिणीने विचारले,
'असा-असा कार्यक्रम आहे येतेस का ?'
'कधी, कुठे ?' - मी.
'रात्री ९ चा आहे, टिळक स्मारकला .'- ती.
'मी नाही जात अग इतक्या उशिरा बाहेर' - मी.

माझे हे उत्तर तिने ऐकले आणि मग माझे छोटेसे बौद्धिकच घेतले.

'जात नाहीस हे कळाले, पण का जात नाहीस ?' - ती.
'आग आमच्या घरी लहानपणापासून अशीच पद्धत आहे', - मी.

'बर ठीक आहे, चांगली पद्धत आहे हि. पण तुमचे गाव लहान होते, तुम्ही मुली-मुलीच होत्या, वगैरे वगैरे वगैरे. म्हणून कदाचित तुमच्या घरी तशी पद्धत असेल. पण इथे पुण्यात उशिरा बाहेर जाणे सुरक्षित आहे, शिवाय आम्ही तुला घरापर्यंत सोडायला तयार आहोत मग काय हरकत आहे यायला ?.

बदलत्या परिस्थिती प्रमाणे सवयी बदलाव्या अग. निदान तेंव्हा ते तसे का होते, याची कारणं शोधून, आत्ता या परीस्थीतीत ती खरच तशीच्या तशी लागू होतात का, हे बघायला काय हरकत आहे ?

नुसतेच 'नाही' म्हंटल्याने होणार काय आहे तर, तुझा एक चांगला कार्यक्रम बघायचा राहून जाणार आहे. कधी कधी आपली आपणच स्वत:ला इतकी बंधन घालतो, आणि आयुष्य त्यातच अडकून पडते.' - ती.

'हम्म्म्म .... ' - मी.

मनातल्या मनात मात्र हत्तीची गोष्ट आठवत होती.

त्यादिवशी मी नाही गेले. पण नंतर काही दिवसांनी, माझ्या घराजवळच पाताळेश्वराच्या मंदिरात त्रिपुरी पोर्णिमे निमित्त 'पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा' कार्यक्रम होता. मी जाणार होते. संध्याकाळी अचानक तीच मैत्रीण दारात.

'काय करते आहेस ?'-ती.
'काही नाही, कार्यक्रमाला निघाले होते'-मी.
'बाहेर सगळेजण आले आहेत, आम्ही पण येतो तुझ्याबरोबर' -ती.
'अरे व्वा ... !!'-मी.

मी तिच्या बरोबर बाहेर आले. सगळा ग्रुप मंदिराकडे निघाला. तिथेच बाहेर सगळ्यांनी गाड्या लावल्या होत्या. तिथे पोहोचल्या बरोबर सगळे आपापल्या गाड्या काढायला लागले. मी म्हंटले, 'काय रे कार्यक्रम नाही बघायचा का ?'

सगळ्यांनी एका सुरात उत्तर दिले 'नाही, आपण Jackie Chan चा चित्रपट बघायला चाललो आहोत, अलकाला'.

गुपचूप गेले त्यांच्या बरोबर. बाहेरच कुठेतरी खाल्ले-पिल्ले, चित्रपट बघितला आणि रात्री १२ ला वगैरे घरी आले.

नंतर बरेच दिवस सगळे मलाच चिडवत होते, 'काय हे, बाळासाहेबांचा कार्यक्रम सोडून Jackie Chan' :) :)

मग चिक्कार फिरले, पुणे आणि आसपास. भरपूर कार्यक्रम/नाटकं/चित्रपट बघितले. रात्रीचे ट्रेक केले. मजेत गेले ते सगळे दिवस. पण हा प्रसंग आठवला कि अजूनही माझी मलाच मजा वाटते.

असा मित्र-मैत्रिणींचा उपयोग होतो फारफार
अबकी बार मोदीसरकार ..... :)

(हे लिहिले तेंव्हा मोदी सरकार येण्याच्या मार्गावर होते)






Saturday, 28 February 2015

रुक्मिणीच्या निमित्ताने

२०१३ च्या मौजेच्या दिवाळी अंकातला अरुणा ढेरेंचा 'रुक्मिणी' बद्दलचा ललित लेख काल वाचला. लेखात त्यांनी तिचे, तिच्या आयुष्याचे - आयुष्यात घडलेल्या मुख्य घटनांचे विश्लेषण, अवलोकन केले आहे. अर्थात खूप सुरेख ओघवते लिखाण आहे. हे लिखाण त्यांनी वाचलेल्या पुस्तकांचे संदर्भ देते त्याचबरोबर त्यांच्या भटकंती दरम्यान त्यांनी ऐकलेल्या कथा/दंतकथांचे पण संदर्भ देते. काही ठिकाणी त्यांनी जाणून बुजून 'रुक्मिणी' विषयी इतर बायांशी साधलेल्या संवादातून पुढे आलेली माहितीपण येते. असे हे रुक्मिणीच्या आयुष्याचे मोजमाप आहे ती सोडून इतर अनेकांच्या तराजूने तोललेले. अर्थात इथे लेखाचा मुख्य विषय रुक्मिणी असल्याने  तिचे म्हणणे काय आहे हे जाणून घेणे शक्य नव्हतेच.

पण हे असे कितीतरीवेळा आपल्या अनुभवासही येते. तुमच्या आयुष्यातली एखादी घटना, महत्वाची किंवा अगदी छोट्यात छोटी, कुठून कुणाच्या ऐकण्यात येते. ती व्यक्ती तिच्या आकलन क्षमतेनुसार, तिच्या स्वतःच्या वैचारिक बंधनांच्या तराजूत तोलून त्यावर स्वताचे एक मत तयार करते आणि अर्थात पुढे तुम्हाला माहितीहि नसलेला एक नवाच पैलू (?) तुमच्या व्यक्तिमत्वाला जोडला जातो. त्याला पुन्हा त्या व्यक्तीची त्या-त्या वेळेची मानसिक गरज, तुमच्या बद्दल मनात असलेल्या भाव-भावना यांचे एक आवरण पण चढवलेले असतेच. कधीकधी मग हे काल्पनिक जोड तुमच्या नकळत कायमस्वरूपीच बिलगून बसतात.

कधी या सगळयाची मजा वाटते, कधी राग येतो तर कधी खूप उदास व्हायला होते. मग कधीतरी असे काही वाचण्यात आले कि नुसतेच गालातल्या गालात हसू येते आणि आपलेच आपल्याला काहीतरी उमजून उगीचच हलके वाटते ..... :)

Thursday, 19 February 2015

अस्वस्थ आठवणी १ - 'ऑफिस बॉय'.

काही व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप थोड्या काळासाठी येतात. पण जेंव्हा जेंव्हा आठवतात तेंव्हा तेंव्हा जीव अगदी कासावीस करून जातात. त्यातलाच हा एक.

शिक्षण संपल्यावरच्या माझ्या पहिल्याच नोकरीच्या ठीकाणी तो 'ऑफिस बॉय' म्हणून कामाला होता. सगळ्या ऑफिसभर फटाफटा स्लीपर वाजवत चालायचा, धपाधपा पाय आपटत जिने उतरायचा आणि मान तिरकी वर करून इकडून तिकडे यायचा जायचा. पहिल्यांदाच बघणाऱ्याला उद्धट वाटेल असेच त्याचे वावरणे असायचे.

पण तसा होता सज्जन. अर्थात हे आणि असे त्याचे गुण समजायला त्याच्याशी चांगली ओळख मात्र व्हावी लागायची. कामसू होता, काहीतरी नवीन शिकायचे असायचे, इकडच्या-तिकडच्या कार्यालयीन बातम्यांमधे त्याला कधीही रस नसायचा आणि तितकाच निरस तो अभ्यासाच्या बाबतीतही होता. १० वी नापास होऊन त्याने शिक्षण सोडलेलं होत. घरच्या परिस्थितीने त्याला नोकरी करण्याशिवाय दुसरा काही मार्गही ठेवला नव्हता.

एका खोलीचे घर आणि त्यात त्याचा जुळा मंदबुद्धी भाऊ, म्हातारी आई, एक अपंग बहिण आणि तो असे सगळे रहात होते. हलाखीची म्हणावी अशीच ती परिस्थिती. पण हा कधीही पैशांसाठी हपापलेला दिसला नाही कि कधी कुणापुढे हात पसरलेला आठवत नाही. इतकेच काय आपले रडगाणेही तो कधी कुणासमोर गात बसलेला मी बघितले नाही. इतर कुणाकुणाकडून ऐकून त्याची परिस्थिती समजली होती.

त्याची रोजची कामं ठरलेली होती आणि त्याव्यतिरिक्त त्याने 'सांग'कामं करणे अपेक्षित होते. पण ठरलेली कामं झाल्याशिवाय तो कुणाचेही कुठलेही काम करतच नसे. एका वरिष्ठ मैत्रिणीने अनेक वेळा त्याला समजावूनही त्याच्या डोक्यात काही ते क्रमाची अदलाबदल करण्याचे कधी शिरलेच नाही. रविवारी तर 'आज आपला मूड बरोबर नाही, आपल्याला जास्त काही काम सांगायचे नाही' असे तो आल्याआल्याच जाहीर करत असे. आणि एरवी रिकामा वेळ मिळाल्यावर जसं तो खिडकीतून एकटक रस्त्याकडे बघत बसायचा तसाच थोडावेळ बसून रहात असे. [इथे कार्यालयीन सुट्टीचा वार गुरुवार होता]

रोज न चुकता 'सामना' वाचणे हा त्याचा छंद आणि  'बाळासाहेब' हा त्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी लिहिलेला आणि त्यांच्याबद्दल लिहून आलेला शब्द न शब्द याला पाठ असे. एकदा असेच सकाळी सकाळी 'मुड' नसल्याची दवंडी ऐकू आली. आम्ही सगळयांनी नेहमीप्रमाणेच हसण्यावारी नेले. थोड्यावेळाने तो माझ्या त्या वरिष्ठ मैत्रिणीकडे गेला आणि अगदी रडवेल्या आवाजात विचारले,  'बायपास' म्हणजे काय हो ? तिने आपले चेष्टेच्याच मूड मध्ये सांगितले, 'अरे माणसाचे हृदय काढून सशाचे हृदय लावतात त्याला बायपास म्हणतात'

याच्या डोळ्यात एकदम पाणीच आले. 'अरे झाले काय ते तरी सांग' असे म्हंटल्यावर याने सांगितले 'अहो बाळासाहेबांची बायपास करणार आहेत. आता तुम्हीच सांगा वाघासारख्या माणसाला सशाच हृदय लावलं तर तो जिवंत कसा रहाणार' बाळासाहेबांची बायपास करणार असल्याची बातमी याने सामना मध्ये वाचली होती आणि त्यामुळे याच चित्त थाऱ्यावर नव्हतं.

मी नोकरी सोडल्यावर पुन्हा कधीच त्याची भेट झाली नाही. एखाद्या मैत्रिणीकडून त्याचे लग्न झाले, मुलगा झाला अशी खुशाली मात्र कळायची. पुढे त्याने पण ती नोकरी सोडली. मग काहीच कळेनासे झाले. तोपर्यंत खरं म्हणजे मलाही विसर पडला होता. आणि मग एकदम बातमी आली. कर्वेरोडवर त्याच्या सायकलला अपघात होऊन तो जागेवरच खलास झाला. 

क्षणात माझ्याडोळ्यासमोर दिसली ती त्याची कधीही न बघितलेली वयस्कर आई, अपंग बहिण, मंदबुद्धी भाऊ, एक अजाण लेकरू आणि ती दुर्दैवी बायको. कुठून बळ आणणार होती हे संकट, ही जबाबदारी पेलण्याच कुणास ठाऊक.

- आरती.


Friday, 9 January 2015

स्वप्न.

बरेच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अचानक एका मैत्रिणीचा फोन आला, 'घरी आहेस का ? येऊ का गप्पा मारायला ?'

'जेवायलाच ये, पोळ्याच करते आहे. भाजी तयार आहे' - मी.

१० मिनिटात ती आलीच. बरोबर तिचा २ वर्षाचा मुलगा पण होता.  लहान मुलांच्या 'खास' सवयीप्रमाणे, माझ्या घरात आल्या आल्या त्याला भूक लागली आणि तो काहीतरी खायला मागू लागला.  त्यावेळी माझ्याघरी कोणी लहान मुल नसल्याने, 'खाऊ' असा काही नव्हता. मला प्रश्नच पडला, याला द्यावे तरी काय ?

'भात लाऊ का पटकन ?' मी मैत्रिणीला विचारले.
 

ती म्हणाली, 'भाजी-पोळी' तयार आहे ना, मग दे भाजी-पोळीच'.
 

मी थोडी घुटमळले पण मग पोळीचे छोटे-छोटे तुकडे आणि बरोबर गवारीच रस्सा असे एका छोट्या ताटलीत घेऊन, ताटली त्याच्या समोर ठेवली.
 

भिंतीला टेकून, मांडी घालून बसून त्या एवढ्याश्या जीवाने भाजी-पोळीचा चट्टामट्टा केला.

त्यावेळी मी आई नव्हते पण मुलांच्या खाण्यापिण्याच्या तक्रारी असणाऱ्या चिक्कार आया अवती-भवती होत्या. त्यामुळे मला खूपच कौतुक वाटले. सहजच मनात विचार आला 'माझे मुल पण असेच असले पाहिजे, जे आईने दिले ते मनापासून खाणारे'. पण हे तेवढयापुरतेच.

मधे एकदा चवळीच्या शेंगांची रस्साभाजी केली होती. १६ महिने, १५ दिवसांच्या माझ्या छकुलीने मांडी घालून बसून, ताटलीत दिलेल्या पोळी-भाजीचा स्वहस्ते चट्टामट्टा केला.

नजरेआड गेलेली स्वप्नपण अशी कधीतरी अचानक पूर्ण होतात. नजरेसमोर बांधून ठेवलेली तर होणारच .......
[त्याबद्दल पुन्हा कधीतरी]