बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Monday 18 July 2016

"कट्यार" च्या निमित्ताने ....

काल झुरिकला 'कट्यार काळजात घुसली' या मराठी चित्रपटाचा शो झाला. आणि त्या निमित्ताने 'कट्यार' स्वित्झर्लंड मधील पहिल्या मोठ्या पडद्यावरच्या मराठी चित्रपटाचा मान मिळवून बसला. अर्थात त्याने काही 'इतिहासात' त्याचे किंवा कुणाचे नाव लिहिले जाणार नाहीये. पण मला सांगायचे आहे ते हे की "इस सबके पीछे मेरा हाथ था" =D

हे काम करताना किंवा आज तुमच्याशी शेअर करताना मला मजा येते आहे कारण मी हे सगळे पहिल्यांदाच करत होते. तसे माझ्यासाठी देश आणि शहर पण नवीन होते आणि हे क्षेत्र पण नवीन. अमेरिकेत शो होत आहेत म्हंटल्यावर 'देसाईना' हक मारली. त्यांनी 'महेश काळे'चे नाव सुचवले. त्याला फेसबुकवर शोधले आणि निरोप ठेवला. 'झुकरबर्ग' काकांचे म्हणणे होते "He typically replies in few hours" आणि खरच त्याचे काही तासात उत्तर आले. तो डिसेंबरमध्ये किती व्यस्त होता हे ज्यांना माहिती आहे त्यांनाच कळेल मला त्याचा reply बघून इतके आश्चर्य का वाटले. त्याने 'स्नेहा'शी (Esselvission) बोलायला सांगितले. तिचे आमचे व्यवहाराचे गणित काही जमेना. मग पूर्वा मदतीला आली. खरंतर तिचे क्षेत्र US-Canada पुरते होते. पण तिने मला आवश्यक ती सगळी मदत केली आणि शेवटच्या दिवसा पर्यंत छोट्या-छोट्या उपयुक्त सूचना देऊन एकूणच माझा उत्साह वाढवला. Producer / Distributor शी संपर्क साधून, प्रताधिकार मिळवून  ते DCP हातात पडेपर्यंतची सगळी प्रोसिजर मला पूर्वाने समजावली. तर पुढचा पार्ट म्हणजे theater booking, key to run, trial run आणि actual screening हे सगळे coordination मी ज्या व्यक्तीकडून शिकले ती तर मला संपूर्णपणे अनोळखी होती. पण न मागता मदत करणारे काही लोक आपल्याला आयुष्यात कधी कधी भेटतात. हा त्यातलाच एक. मी 'मदत करा' असे म्हणायच्या आधीच 'हा' मदत पुढे करून तयार असायचा. 

या सगळ्यांचेच खूप खूप आभार. या सगळ्या प्रकारात एक संपूर्णपणे वेगळाच अनुभव माझ्या गाठीशी बांधला गेला आणि बरेच काही नवीन शिकवून गेला. 

त्याहूनही महत्वाचे पुढेच आहे :)

पूर्वाने अमेरिकेत असंख्य शो केले. आम्हाला तसा उशीरच झाला होता. मी तिच्याशी बोलत होते त्या काळात तर ती तिकडची आवाराआवर पण करायला लागली होती. एकदा असाच काही कारणाने आमचा फोन झाला आणि त्या संभाषणाअंती ती मला म्हणाली "आरती, you are so very organized person. मी इतक्या लोकांशी डील केलं गेल्या काही दिवसात. पण तुझ्याबरोबर काम करायला मजा आली." 

मला पण ऐकायला खूपच मजा आली.



Thursday 14 July 2016

'सखी'


१९९५ ते २०१५, मोजलं म्हणून लक्षात आल की पूर्ण २० वर्ष झाली आहेत आमची ओळख आणि त्याच्या अगदी पाठोपाठ मैत्री होऊन. मी काम करत असलेल्या विभागात सगळे 'बाप्ये' होते आणि अचानक एक दिवस ही आली. माझ्या त्यावेळच्या स्वभावाला अनुसरून तिच्याकडे बघून मी जरासं हसले आणि माझ्या जागेवर जाऊन बसले. ती मात्र तोंडभरून हसली आणि लगेचच उठून मी बसले होते तिथे आली. त्या सगळ्या बाप्यांमध्ये कंटाळलेल्या मला मैत्रिण मिळाली म्हणून मी कितीही खुश झाले असले तरी असं ताबडतोब जाऊन गप्पा मारण मला जमणारं नव्हत.

सकाळी आल्यावर ती रोजच माझ्याशी २-४ वाक्य बोलायची आणि जेवताना ग्रुपमध्ये थोड्या गप्पा व्हायच्या. मग झालं अस की आमचे दोघींचे साहेब एकच असल्याने अचानकच आम्हाला एकत्रितपणे एका प्रोजेक्टची जबाबदारी देण्यात आली. दोघींचे कामाचे स्वरूप पूर्ण वेगळे होते, पण संपूर्णपणे एकमेकांवर अवलंबून होते. ती मोठ्याने हसायची, मोठ्याने बोलायची. मला हळूच हसा-बोलायची सवय होती. मला वैयक्तिक काहीच बोलायचं नसायचं आणि ती एकदम मोकळ्या गप्पा मारायची. असे आमचे बरेच विरुद्ध स्वभाव असले तरी मला काय म्हणायचंय ते तीला आणि तिला काय म्हणायचंय ते मला, नीटच कळत होत. त्यामुळे अगदी नवख्या असूनही आमच ते प्रोजेक्ट एकदम टकाटक झाल. आणि त्याच दरम्यान कधीतरी आमची घट्ट मैत्री पण झाली.

गप्पा मारायला मिळाव्या म्हणून आम्ही पौडफाट्याहून चालत निघायचो ते थेट कोर्पोरेशन पर्यंत. तिथे ती सांगवीच्या बसमध्ये बसायची आणि मी पौडरोडची बस घेऊन परत उलट यायचे. इतकावेळ गप्पा मारून पुन्हा बसस्टॉपवर थांबून पण गप्पा असायच्याच. कधीतरी निघाल्या निघाल्या 'सुरभी' मध्ये पावभाजी खायचो पण जास्तवेळा थेट गंधर्वला पोहोचून 'वडा-सांबार आणि चहा' घ्यायचा, असे आम्ही जवळ जवळ रोज करायचो. विरुद्ध स्वभावाच्या आमच्या दोघींच्या आवडी-निवडी मात्र बऱ्याच एकसारख्या होत्या त्यामुळे गप्पांना अंत नसायचा.

मग मी ती नोकरी सोडली आणि पुण सोडलं. नंतर तिचं लग्न झालं आणि पुण सुटलं. क्वचित होणाऱ्या भेटीगाठी बंदच पडल्या. त्यावेळी आमच्या आयुष्यात मोबाईल फोन आणि इंटरनेट दोन्ही आलेले नव्हते. त्यामुळे भेटीबरोबर गप्पाही थांबल्या.

नंतर ती आणि मी, दोघीही, परत पुण्यात आलो आणि क्वचित कधीतरी भेटू पण लागलो. पण आयुष्य इतकी बदलली होती आणि व्यस्त झाली होती की बोलायला सुरुवात करेकरेपर्यत निघायची वेळ होत असे. माझ्यापेक्षाही तीचा वेळेचा प्रश्न जास्त होता. लहान मुल, नोकरीत वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि घरच्या जबाबदाऱ्या. आणि मग पुन्हा एकदा मी पुण सोडलं :)

आत्ता आज हे सगळ आठवायचं कारण म्हणजे, ३ आठवड्यांपूर्वी ऑफिसच्या कामाने ती माझ्या 'टाईम झोन' मध्ये आली होती. तीन आठवडे प्रत्येक दिवशी कधी संध्याकाळी कधी रात्री आणि सुट्टीच्या दिवशी दुपारी सुद्धा जेंव्हा जेंव्हा जमेल तेंव्हा तेंव्हा आम्ही एकमेकीना फोन केले आणि चिक्कार गप्पा मारल्या. ती एकटीच होती त्यामुळे ऑफिसमधून आली की तशी मोकळी असायची. मी रोजची जरुरी काम संपवून तयारच असायचे. पहिले २-३ दिवस तर अगदी मेडीटेशनला बसल्या बसल्या जशी विचारांची गर्दी होते तशी विषयांची गर्दी झाली. मग हळू हळू एक एक विषय हातावेगळे होत गेले. बरीच देवाण-घेवाण झाली. तास-दीड तास बोलून मग 'जाउदेना आपल्याला काय करायचंय' असा तो एक 'खास' फोन पण झाला. एकूण मनसोक्त गप्पा झाल्या. खळखळून हसून झालं.

'त' म्हंटल्यावर 'ताकभात' की 'तूपभात' हे अचूक ओळखणारी आणि बोलणाऱ्याच्या बोलण्यामागाची प्रामाणिक भावना जाणणारी व्यक्ती समोर असेल तर गप्पांना जी मजा येते ती काही वेगळीच असते.
'आता आपण आठवड्यातून एकदातरी बोलतच जाऊ' असा तो नेहमीचा निरोप घेऊन ती काल परत पुण्याला गेली. मला पक्की खात्री आहे आता किमान काही महिने तरी आम्ही एकमेकींना फोन नक्कीच करणार नाही पण जेंव्हा करू तेंव्हा अगदी सहजच  दोघी मिळून मागच्या पानावरून पुढच्यावर डोकावू .......

Wednesday 13 July 2016

काव्यदिंडीच्या निमित्ताने .....


खरतरं गेली काही वर्ष कवितांच वाचन खूपच कमी झाल आहे. कारण जुनी पुस्तकं जवळ नाहीत आणि नवी घेतली गेली नाहीत. पण या काव्यदिंडीच्या निमित्ताने गेल्या काही दिवसात कितीतरी नव्या, विस्मृतीत गेलेल्या, बऱ्याच कविता वाचनात आल्या. पण आता चार निवडायची वेळ आली तेंव्हा मात्र पुन्हा काहीच आठवेना. 

.नवीनच पुण्यात आले होते. 'डीएसके गप्पा' नावाच्या कार्यक्रमात ना.धो.महानोर काव्यवाचन करणार होते. त्या आधी मी महानोरांच्या बऱ्याच कविता वाचल्या होत्या, त्यांनी लिहिलेली गाणी ऐकली होती. पण दोन अडीच तासांच्या त्या कार्यक्रमात महानोरांची कविता एका वेगळ्याच रुपात समोर आली. महानोरांची कविता समजत नाही असे सहसा होत नाही. पण खरी भिडली ती त्यादिवशी. सहज - साधी - ओघवती शैली. कुठलाही अभिनिवेश नाही की 'स्टाईल' चा खटाटोप नाही. कविता, तिची निर्मिती प्रक्रिया, तिच्या जन्माची कहाणी आणि बरेच काही. कवितेतून श्रोत्यांशी साधलेला संवादच होता तो. त्या दिवसापासून महानोरांची कविता वाचतानाची मानसिकताच एकदम बदलली. 

.महानोरांची बरीच गाणी आणि कविता आवडत्या आहेत परंतु ही कविता आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारी आहे, म्हणून तिची निवड.

.पीक करपलं पक्षी दूरदेशी गेलं
गळणार्‍या झाडांसाठी मन ओथंबलं
वेढून नेणारी रित्या नभी वाहाटूळ
आसमंत वेटाळून काळजाची कळ
दु:ख पेलण्या एवढं बळ नाही डोलां
कडू काल्यावण्यांनी भारावला गला
कोवल्या गर्बाला जल्माआधी वनवास
वो मालवला दिसं, मालवला दिसं

- ना.धों. महानोर.

-------------------

मी बरीच वर्ष ठराविक कवींच्याच कविता वाचायचे. त्यामुळे बोरकर,मर्ढेकर,पद्मा गोळे यांच्या कविता मी कधी वाचल्याच नव्हत्या. पुण्यात यशवंतरावला बघितलेल्या सुनीताबाई देशपांडेंच्या 'एक कवितांजली' या कार्यक्रमात पहिल्यांदा माझी या कवींतांशी ओळख झाली. आणि मग सुनीताबाईंनी त्या कार्यक्रमात वाचलेल्या, नुसताच ओझरता उल्लेख केलेल्या आणि इतरही अजुन बऱ्याच कविता शोधून शोधून वाचल्या, वाचत राहिले. या सगळ्याजणींमध्ये लक्षात राहिली ती पद्मा गोळे यांची 'चाफ्याच्या झाडा'.

त्याचं कारणही तसंच आहे. काही कामासाठी मी सुनीताबाईंच्या घरी गेले होते. दोन मिनिटांचे काम होते पण दोन तासाहून अधिकवेळ मी तिथे होते. अर्थातच त्या बोलत होत्या आणि मी ऐकत होते. विषयातून विषय निघत, या कार्यक्रमाचा विषय निघाला आणि त्यांनी मला पद्मा गोळे यांची, त्यांना विशेष आवडणारी म्हणून ही कविता म्हणून दाखवली..
पुलंना जाऊन बरीच वर्ष झाली होती. त्याही बऱ्याच थकलेल्या दिसत होत्या. सगळीकडे एकटेपण भरून राहिलेलं ते घर तर अगदी सूनं सूनं वाटत होत. तिन्हीसांजेची वेळ होती आणि मी कविता ऐकत होते ............

चाफ्याच्या झाडा..
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु: ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा 
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा ….

नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू 
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात 
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर 
बसूनआभाळात हिंडलोय ना

चाफ्याच्या झाडा …. चाफ्याच्या झाडा ….
पानात, मनात खुपतंय ना 
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय …. कळतंय ना ….
चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना.

– पद्मा गोळे..
---------------------------

सकाळ पेपरमध्ये एक सदर येत होते. नाव अजिबातच आठवत नाहीये. पण त्याअंतर्गत 'नवंकवी' म्हणून कवी सौमित्र यांची थोडक्यात ओळख आणि काही निवडक कविता छापून आल्या होत्या. थोड्या वेगळ्याच वळणाच्या त्या कविता खूपच आवडल्या.

अर्थातच माझी आजची कविता 'माझिया मना' सगळ्यात जास्त आवडली. तेंव्हाच कधीतरी त्यांचा
काव्यसंग्रह 'आणि तरीही मी' येत असल्याचे वाचले. तो मात्र सांगितल्या तारखेच्या खूपच उशिरा आल्याने
मधल्या काळात मी अनेकवेळा अप्पा बळवंत चौकात त्याच्या चौकशी करता चक्कर टाकून येत असे. अखेर तो आला.पण आधीच्या चार कविता वाचून वाढलेल्या अपेक्षा काही त्याने पूर्ण केल्या नाहीत. खूप उस्तुकतेने वाट बघितल्यामुळे असेल, माझी खूपच निराशा झाली आणि नंतर मी या कवीचे फारसे काहीच वाचले नाही. परंतु ही कविता मात्र कायमच आवडत्या कवितांच्या यादीत राहिली.'ऋतू हिरवा' ऐकल्या नंतर तर थोडी अधिकच भावली.
.
माझिया मना, जरा थांब ना
पाऊली तुझ्या माझिया खुणा
माझिया मना, जरा बोल ना
एकटी न मी सोबतीस तू
माझिया मना, जरा ऐक ना
रात्र ही सुनी, तुझे बोलणे
तुझे धावणे अन मला वेदना
ओळखू कसे मी, हे तुझे ऋतू
ओळखू कशा मी तुझ्या भावना
सांजवेळ ही, तुझे चालणे
उषःकाल आहे नवी कल्पना

- सौमित्र (Kishor Kadam)
--------------------------------
NRI मायबोलीकर (www.maayboli.com) आले की त्यांना भेटायला पुण्यातले मायबोलीकर एकत्र जमायचे. अश्याच एका प्रसंगी माझ्यापासून ३ खुर्च्या लांब बसलेल्या वैभवने हात लांबवून त्याचा फोन मला दिला आणि 'हे ऐक' असे सांगितले. तोपर्यंत वैभवने मायबोलीवर टाकलेल्या सर्व कविता वाचत होते आणि त्या आवडतही होत्या. पण त्याची कविता त्याच्याच आवाजात त्यादिवशी मी पहिल्यांदाच ऐकत होते. आणि हा काही वेगळाच अनुभव होता. मला खात्री आहे अनेकवेळा त्याचे कार्यक्रम बघितलेले अनेकजण अगदी एकमताने हेच म्हणतील. :)

"वैभवच्या कविता" याबद्दल मी काही लिहिण्याची खरतरं आवश्यकताच नाही. कारण माझ्या मित्र यादीतल्या सर्व काविताप्रेमिनी त्या अनुभवलेल्या आहेत. इतकंच म्हणेन वैभवच्या कविता नेहमीच अगदी ताज्या आणि टवटवीत असतात.

असंख्य आवडत्या कवितांमधून एक निवडणे अवघडच होते पण ही अनेकवेळा त्याच्याकडून ऐकूनही पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी म्हणून हिची निवड .... 

'नेमस्त'
धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हाच्या ओळी
तो शहारला नेमाने ही कविता सुचतेवेळी
नित्यागत उमलत गेली हळुवार कल्पना त्याची
सवयीचा सुगंध आला होताच फुले शब्दांची
नेमस्त हरखला तोही द्यावया ना उरले काही
नेमस्त चरकला फिरुनी ... "ही शेवटची तर नाही?"
रे छळू नका रे त्याला का नवे न काही स्फुरते
एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते...

- वैभव जोशी.

उर्सली

"उर्सली" ही एका छोट्या मुलाची एक छोटीशी गोष्ट आहे. मूळ जर्मन कथेच इंग्रजी रुपांतर रेवाकडे आहे. आणि सध्याच्या रोज वाचण्याच्या पुस्तकांपैकी ते एक आहे. कधी आम्ही पुस्तक हातात घेऊन वाचतो तर कधी गोष्ट म्हणून पुस्तक न घेताच तिला ऐकायची असते. अगदी सगळ्या बारकाव्यांसहित.
.
उन्हाळ्यात आपल्या सगळ्या जनावरांसाहित डोंगरावर राहायला जाणाऱ्या आणि हिवाळ्यात डोंगर पायथ्याशी आसऱ्याला येणाऱ्या एका कष्टकरी कुटुंबातला उर्सली हा एकुलता एक आणि समंजस मुलगा. गावातल्या एका उत्सवासाठी लहान मुलामध्ये वाटल्या जाणाऱ्या घंटापैकी सगळ्यात छोटी त्याच्या वाट्याला येते. आणि ती पण मोठ्या मुलांच्या दादागिरीमुळे. अपमानित झालेला उर्सली भर हिवाळ्यात, हिमवर्षाव - निसरडी वाट - थंडी यापैकी कशालाही न जुमानता डोंगरावरच्या घरातून मोठी घंटा आणतो आणि सगळ्यात मोठ्या घंटेचा मान मिळवून त्या उत्सवाच्या मिरवणुकीत पुढचे स्थानही मिळवतो. अशी काहीशी ती गोष्ट आहे.
.
परवा अचानकच इथे झुरिकमध्ये "Schellen-Ursli" नावाचा चित्रपट लागल्याचे वाचण्यात आहे. रेवाने अजून पर्यंत कधीच मोठ्या पडद्यावर चित्रपट बघितला नव्हता. म्हटलं चला तिला घेऊन जाऊ, लाडकी गोष्ट पडद्यावर बघण्याची जरा वेगळी गम्मत. मग शुक्रवारी जाऊन तिच्या वयाला चित्रपटगृहात प्रवेश असल्याची खात्री करून घेऊन तिकीट पण काढून आणले. उद्या सकाळी आपण नक्की काय करणार आहोत याचा तिला काहीच अंदाज नव्हता. 'मुव्ही बघायचा' असे म्हणत होती.
.
आज सकाळी गेलो. आत जाऊन आपापल्या खुर्चीत बसलो आणि जाहिराती सुरु झाल्या. बाईंचा चेहरा कोरा, दोन्ही हातांनी दोन्ही खुर्च्यांना घट्ट पकडलेले आणि एकदम स्तब्धपणे समोरच्या जाहिराती बघत होती. इतकी मोठ्ठी चित्र आणि घुमणारा आवाज दोन्ही अजून मानवत नव्हते. अशीच पाच एक मिनिटं गेल्यावर विचारले 'आई, उर्सली कधी येणार ?'
.
मग चित्रपट सुरु झाला. भरगच्च स्नो असलेल्या छोट्याश्या गावाच्या अनेक गल्ल्या दिसल्या आणि मग एका गल्लीच्या शेवटच्या टोकाला उर्सलीचे घर दिसल्या बरोबर म्हणाली 'आई, बघ उर्सलीच्या घरावर Drawing आहे'. इथून मग सगळे बारकावे तपासण सुरु झालं. आपण जो गोष्टीत ऐकला आहे, पुस्तकात ज्याच फक्त चित्र बघितलं आहे, तो 'उर्सली' असा समोर बघून खुदू खुदू हसू येत होत. तिच्या मनातल्या प्रतिमेशी तो किती मिळता जुळता होता माहिती नाही पण मधेच माझा हात पकडून हसून म्हणाली 'आई, उर्सली'.
गोष्टी इतका चित्रपटात गोडवा नाही. थोडा माल-मसाला आहेच. त्या खटाटोपात कोल्ह्याला उर्सलीचा मित्र दाखवले आहे. "डामरट तो कोल्हा' या तिच्या मनातल्या प्रतिमेला तडा गेल्यामुळे हा बदल तिला अजिबातच आवडला नाही. 'आई कोल्हा त्रास देतो ना सगळ्यांना ?! ' असे विचारण्यात आले. गोष्टीत, एवढा प्रचंड बर्फाच्छादित डोंगर चढून गेल्यामुळे थकलेला उर्सली घरात गाढ झोपलेला असतो. तेंव्हा बाहेर त्याच्या पावलांचे ठसे बघून तिथे जमलेले कोल्हे, हरणांना विचारतात 'हा लहान मुलगा इथे कशासाठी आला आहे ?' मग एक हरीण घरावर चढून तो आत नक्की काय करतो आहे ते बघून येते. हा प्रसंग चित्रपटात नव्हता. त्याची पण तातडीने आठवण करून देण्यात आली.
.
पण एकूण बर्फात खेळणारा उर्सली, बेडूक मुठीत पकडणारा उर्सली, शेळ्यांच्या मागे धावणारा उर्सली, गवतात लोळणारा उर्सली, कोल्हयाला चीज भरवणारा उर्सली, असा सगळ्या रूपातला उर्सली तिला खूपच आवडला. तिचे उस्फूर्त प्रश्न आणि मजेदार टिपण्णया ऐकता ऐकता, तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव निरखता निरखता माझा चित्रपट संपला. तिच्या डोळ्यांसमोर अजूनही चालूच आहे ......

Tuesday 12 July 2016

आईचे प्रशस्तीपत्रक.

तशी तिला कुणाच्या कुठल्याही शिक्कामोर्तबाची आवश्यकता आणि तीही आत्ता नव्याचे तर अजिबातच नव्हती. पण मलाच असं वाटलं की तिने आयुष्यभर इतकं हरतऱ्हेच विणकाम केल आहे तर गंमत म्हणून तिच्यासाठी एक मागवावंच. 

खरतरं जागतिक विक्रमासाठी हा जो pattern आम्ही सगळ्यांनी विणला हा खूपच सोप्पा आणि अगदीच बेसिक लेव्हलचा होता. यापेक्षा कितीतरी अवघड, सुरेख आणि सुबक नमुने तिने आजपर्यंत केले आहेत. फक्त क्रोशाच नाही तर दोन सुयांचे विणकाम पण तिने चिक्कार केलं आहे. आम्हा भावंडांसाठी केलं, नातेवाईकांसाठी केलं, शेजारी-पाजारी, ओळखीचे-पाळखीचे अश्या असंख्य लोकांना तिने तिच्या हाताने विणून हरतऱ्हेचे प्रकार दिले आहेत. असा एकही प्रकार नाही जो तिने हाताळला नाही. बर फक्त विणून दिले नाही तर बऱ्याच लोकांना अगदी बोटाला धरून शिकवले पण आहे. आणि ती मात्र हे सगळ कुणाच्याही कुठल्याही मदती शिवाय नुसत डोळ्याने नमुना बघून बघून शिकली आहे / शिकते आहे.  

जे विणकामाचे तेच भरतकामाचे आणि शिवणकामाचेही. स्वतःच्या हाताने नक्षी काढुन अत्यंत सुबक पद्धतिने निरनीराळ्या टाक्यांनी ती सजवणे यात तीचा हातखंडा होता. आम्ही बहिणी श्रीरामपूर सोडेपर्यंत तिने शिवलेलेच कपडे घालत असू. कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय तिने शिवलेले सगळे कपडे अगदी व्यावसायिक नमुन्यांच्या तोडीस तोड असायचे. शिवणकाम तर तिने किती लोकांना शिकवले त्याची गणनाच नाही. अनेकजणी तर त्यानंतरही तिच्याकडून कपडा बेतून घ्यायला यायच्या आणि मग घरी जाऊन शिवायच्या. 

अजूनही या वयातही, घरकाम झाले की लगेच तिचे हात भरतकाम-विणकाम-शिवणकामात गुंतलेले असतात. लाडाच्या नातवंडांसाठी नवेनवे प्रकार अजूनही ती त्याच उत्साहाने करत असते.

बाकी पाककला, चित्रकला, हस्तकला असे ज्या कश्याच्या मागे-पुढे 'कला' हा शब्द येतो त्या सगळ्यातही ती पारंगत आहेच. नव्यानव्या गोष्टी माहिती करून घेणे आणि त्या सगळ्याचे नव्याने प्रयोग करून बघणे हे सगळे ती या वयातही करते आहे.

आमच्या "पंचक्रोशीत" तिला तिच्या गुणांसाठी ओळखणारे अनेक आहेत. तिला ओळखणाऱ्या सगळ्यांनीच नेहमीच भरभरून तिची स्तुती केली आहे. तिच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला तिच्या कलागुणांच भरपूर कौतुक आहे. अगदी "भरून पावावं" इतक्या मोठ्या प्रमाणावर हे असं सगळ कौतुक आजपर्यंत तिच्या वाट्याला बरेचदा आलं आहे. 

पण तरीही माझी इच्छा म्हणून तिच्या शिरपेचात हा एक छोटासा तुरा माझ्याकडून ............


Sunday 13 March 2016

'रानबखर'

[ही बखर आहे, इतिहास नाही. पक्षधराने लिहिलेल्या घडल्या गोष्टीचेच हे कवन आहे. स्वत: रानात असताना आणि रानसख्यांवर लिहिली, म्हणून ही रानबखर.]
----------------------------------------------------------------------------------------------------
जानेवारी २०१४ ला हे पुस्तक प्रकाशित झाले. लगेच वाचायचे ठरवूनही विकत घ्यायलाच मे २०१५ उगवला आणि वाचायला मार्च २०१६. तर ही बखर मुख्यतः लक्षात राहते ती आदिवासींवर झालेल्या अन्यायाची कहाणी म्हणून, पण ती त्यापुरतीच मर्यादित नक्कीच नाहीये. समस्या मांडल्या आहेत पण त्यांची उत्तरं पण सुचवली आहेत. मिलिंद थत्ते स्वतः गेली अनेक वर्षे या लोकांबरोबर वास्तव्य करून आहेत त्यामुळे विचारप्रक्रिये मधुन डोकावणारे आणि जाणिवपूर्वक सुचवलेले सगळेच पर्याय पटण्याजोगे आहेत.
.
पुस्तकाच्या सुरुवातीला आदिवासींच्या आयुष्याची अगदी जवळून ओळख करून दिली आहे. त्यांचे जंगलाशी असलेले नाते, त्यांचे परस्परावलंबित्व, पर्यावरण प्रणालीत असलेले त्यांचे मुख्य स्थान, जंगलाभोवती वसलेलं त्याचं जग आणि त्यांची जीवनपद्धती. हे सांगत असतानाच त्यांची अल्पसंतुष्ट वृत्ती, कधी परिस्थितीशी सहज जमवून घेणारे तर कधी परिस्थितीवर लीलया मात करणारे असे त्यांच्या आयुष्यातले बारकावे दाखवणारे अनेक प्रसंग आले आहेत. संदर्भाने एके ठिकाणी त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रसंगी करण्यात येणाऱ्या नाचांच्या प्रकारांच सवीस्तर वर्णन आलं आहे. अहाहा, अगदी लगेच उठून एखाद्या आदिवासी पाड्यावर चक्कर मारून यावी असं वाटायला लावणारं ते सगळ वर्णन आहे. अशी ही सगळी जीवनपद्धति विस्ताराने सांगीतल्याने पुढे मांडलेल्या समस्यांचं गांभीर्य थेट पोहोचलं आहे.
.
नक्षलवादाचा उगम आणि वाटचाल, आदिवासी लोकांची झालेली परवड आणि उध्वस्त झालेली आयुष्य, सरकार आणि संस्थांनी त्यांच्या तोंडाला पुसलेली पानं आणि केलेली फसवणूक, याची अनेक उदाहरणं पुस्तकात दिलेली आहेत. हे पुस्तक वाचण्याआधी "Reserve Forest" आणि "Buffer Zone" या शब्दांच कोण कौतुक होतं मला. पण हे सगळं वाचताना त्याचा नेमका अर्थ, हेतू आणि परिणाम समजले आणि डोळेच उघडले. ज्यांना वनबंदी करण्यात आली किंवा ज्यांची जमीन गेली, त्यांनी नक्की काय भोगलं ते असं लांबून पुस्तक वाचून समजेलच अस नाही पण या पुस्तकात अशी अनेक उदाहरणं आहेत जी अस्वस्थ, खूप अस्वस्थ करून गेली. त्यातलच हे एक, नन्हेरामच .... पूर्ण अबोल झालेल्या नन्हेरामने एकदाच तोंड उघडलं आणि म्हणाला "साहेब, त्या धरणाच्या पाण्यात मी जेंव्हा होडीतून जात असतो तेंव्हा तिथे पाण्याच्या मध्यावर मी थांबतो. मला दिसतं तिथे - तिथेच शेकडो फूट खाली माझ गाव आहे, घर आहे आणि शेतही आहे. आणि ते सगळ कायमचं हरपलं आहे, या जाणीवेने माझा ऊर फाटतो. ती वेदना मला सहन होत नाही."
.
मुंबईपासून सुरुवात करून सह्याद्री,सातपुड्याची सफर घडवत, बऱ्हाणपूरमार्गे मेळघाटातून छत्तीसगढ गाठून थेट झारखंड पर्यंत फिरवून आणताना वाटेत भेटणारी जंगलं-नद्या आणि त्यांच्या आश्रयाने विसावलेल्या विविध आदिवासी जमातींची माहिती इतकी सहज सोप्प्या भाषेत दिली आहे की डोळ्यापुढे नकाशाच उभा राहतो. 
.
पुस्तकातली भाषा ही 'पुस्तकी' अजिबातच नाही. रोखठोक बोली भाषा आहे. आणि त्यामुळेच अगदी समोर बसून एखाद्या हाडाच्या कार्यकर्त्याने त्याची तळमळ / तळतळ आपल्या समोर मांडवी आणि आपण अस्वस्थपणे ऐकावी, असा काहीसा हा अनुभव आहे. 
.
बाकी सरकारी यंत्रणा आणि संबंधित संस्था यांच्या 'कारभाराची' नुसती वर्णन वाचूनच माझे पाय गळाले. तर त्या सगळ्याचा इतक्या जवळून आणि वारंवार अनुभव घेऊनही खंबीरपणे उभं असलेल्या आणि इतरांना उभं रहाण्यास प्रोत्साहन देणाऱ्या 'वयम्' ( Vayam ) टीमला सलाम. 
.
आवर्जून वाचा.
.
रानबखर - मिलिंद थत्ते. 
समकालीन प्रकाशन.
पृष्ठे - ९५.
किंमत - १०० रुपये.


--------------------------
'वयम्' ही मिलिंद थत्ते यांनी स्थापन केलेली सामाजीक संस्था आहे. त्यांचे सगळे काम या संस्थेमार्फतच चालते. वयम् चे वैशीष्ठ्य म्हणजे त्यंच्याबरोबर काम करणारे बहुसंख्य कर्यकर्ते हे चळवळीतुन तयार केलेले / झालेले 'स्थानिक' कार्यकर्ते आहेत. 
वयमच्या फेसबुक पानाची लिंक :
https://www.facebook.com/VayamIndia/
---------------------------
पुस्तक बुकगंगावर उपलब्ध आहे.
http://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=%E0%A4%B0%E0%...


Wednesday 5 August 2015

ब्लाउसी लेक.

एका गावात एक निळ्या डोळ्यांची सुंदर मुलगी रहात होती. तिचा प्रियकरही त्याच गावात रहात असे. गावाजवळच्या एका छोट्या तळ्यावर ती त्याला भेटायला जायची. सूर्यास्तापासून ते अगदी चंद्राचे प्रतिबिंब त्या नितळ पाण्यात उमटे पर्यंत ती दोघे तिथेच असायची. असेच मजेत दिवस चालले होते. पण एके दिवशी काही वेगळेच घडले. पाय घसरून तो पडला. पडला तोच एका टोकदार दगडावर. डोक्याला मार लागला आणि सगळाच खेळ संपला.

ती अगदी सैरभैर झाली. जे घडल आहे त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. त्याच्या आठवणीनी व्याकूळ झालेली ती अजूनही रोज संध्याकाळी तळ्यावर जात होती. तळ्याच्या मध्यात बोट घेऊन जायची आणि तिथेच बसून ती आक्रोश करत रहायची. अशा कितीतरी रात्री गेल्या पण ती आपले दुख:त्या तळ्याला रोज सांगत राहिली. आणि एक दिवस नाका-तोंडात पाणी जाऊन गुदमरून मृत झालेले तिचे शरीर पाण्याच्या तळाशी सापडले. शेजारीच खचून रुतलेली ती बोटही.

तिच्या निळ्या डोळ्यांच्या स्पर्शाने तळ्याचे पाणी त्यादिवशी निळे झाले ते कायमचेच...........

तेच हे ब्लाउसी लेक. ब्लाऊ म्हणजे Blue म्हणजेच निळे. गर्द झाडीत वसलेले हे अगदी छोटेसे तळे आहे. आम्ही गेलो होतो तेंव्हा तिथल्या नावाड्याने आम्हाला वरील कथा सांगितली. खर सांगायचं तर त्याची सत्यासत्यता पडताळून पहावी असे वाटलेच नाही.

तर, स्वित्झर्लंडच्या सहलीत ईंटरलाकेनला भेट देणार असाल तर आवर्जून याचाही समावेश करावा असं हे ठिकाण आहे. आल्प्स पर्वतरांगाच्या आसपास आढळणाऱ्या जलाशयांमध्ये हे सगळ्यात देखणे आहे असे ऐकले. 'कांडेरगृंड' नावाच्या गावाजवळ 'कांडेर' नदीच्या खोऱ्यात एका विस्तीर्ण उद्यानाच्या साधारण मध्यावर हे तळे आहे. तळ्याच्या एका बाजूला प्रचंड उंचीचा एक कातळ आहे. निळे आणि संपूर्ण पारदर्शक असे पाणी, नितांत सुंदर परिसर, खच्चून भरलेले निसर्ग सौंदर्य, डोळ्यांसाठी पर्वणी ठरावी असे सगळे दृश्य आहे. वल्ह्याच्या एका छोट्याश्या बोट राईडची सोय आहे. बोटीच्या तळाला काच लावलेली आहे जेणेकरून तळ्याच्या मध्यभागी सुद्धा, जिथे खोली साधारण ४० फुट आहे, पाण्याच्या पारदर्षषकतेचा अनुभव घेता येतो आणि जलाशयाचा तळ अगदी स्पष्ट दिसतो. पलीकडेच लहान मुलांना खेळण्यासाठी 'प्ले एरीया' पण आहे. बसायला लाकडी बाक आहेत. ग्रीलची पण सोय आहे. तसे तळे निरखून बोट राईड ईत्यादीसाठी तास-दीडतास खूप झाला. पण एक पूर्ण दिवस तिथे घालवायला आवडावा असे हे ठिकाण नक्कीच आहे.

१५००० वर्षांपूर्वी तळ्याच्या मागच्या डोंगरावरून दरड कोसळल्याने खळगा तयार होऊन या तळ्याची निर्मिती झाली. जलाशयाच्या तळाशी जिवंत झरे आहेत त्यामुळे पाणी स्वच्छा आणि पिण्यास योग्य आहे. आश्चर्य म्हणजे भर हिवाळ्यातही तापमान जेंव्हा शून्याच्या कितीतरी खाली गेलेले असते तेंव्हाही या तळ्याचे पाणी गोठत नाही. या पाण्याचे तापमान वर्षभर ८ ते ९ डिगरी सेल्सिअस असे स्थिर रहाते. त्यामुळे यात रंगीबेरंगी मासे आणि बदकं वर्षभर वास्तव्याला असतात. (पर्यटकांना हे गोड्या पाण्यातले ताजे मासे मिळण्याची सोय शेजारच्या हॉटेल चालकाने केलेली आहे). तळ्यातले सगळे पाणी दर ८ दिवसांनी पूर्णपणे नव्याने येते, जुने वाहून जाते अशी अजून एक माहिती त्या नावाड्याने दिली.

एवढेसे ते तळे पण त्यातही देखणे छोटेखानी लाकडी पूल बांधलेले आहेत. तळ्याच्या संपूर्ण बाजूबाजूने 'वॉक वे' केलेला आहे. त्यावरून फेरफटका मारताना अजून काही बारकावे लक्षात येतात. पाण्यात तळाशी काही ओंडके, झाडांची खोडं पडलेली दिसतात. चौकशी केल्यावर समजले की ती तशीच २०० वर्षांहून अधिक काळ तिथेच पडून आहेत, अजिबात न कुजता, खराब न होता. हा त्या पाण्याचा अजून एक गुणधर्म. तळ्या भोवतीच्या या फेरफटक्यातच आपल्याला एक देखणे शिल्प दिसते. कुण्या शिल्पकाराने त्या 'निळ्या डोळ्यांच्या' मुलीची आठवण म्हणून तिचे दगडी शिल्प पाण्याच्या तळाशी बनवले आहे.

जुलै-ऑगस्ट या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये इथे बरीच गर्दी असते. पण आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गेलो होतो तेंव्हा हवा तर मस्त होतीच पण गर्दी अजिबातच नव्हती. अजून एखादाच ग्रुप तिथे आलेला होता. त्यामुळे थोडे सिझनच्या आधी गेले तर निवांतपणे तिथल्या सृष्टी सौदर्याची, शांततेची मजा घेता येऊ शकते. तळ्याच्या मागच्या बाजूने 'ट्रेक / ट्रेल' साठी पण मार्ग तयार केलेला आहे. आवड आणि सवड असल्यास तिकडेही एक फेरफटका मारता येतो.

उघडण्याच्या वेळा :
उन्हाळ्यात - सकाळी ९ ते संध्याकाळी ५,
हिवाळ्यात - सकाळी १० ते संध्याकाळी ५

१. झुरीकहून जायचे असल्यास,
स्वत:ची गाडी असल्यास साधारण २.३० तासांचा प्रवास आहे. अंतर १५० किमी.
ट्रेनने जायचे असल्यास ३ तासाचा प्रवास आहे. झुरिक मुख्य स्थानकावरून ट्रेन मिळेल Zurich - Spiez - Frutigen (इथे ट्रेन बदलावी लागते) - Kandergrund.
(झुरिकहून झरमॅटकडे जाणाऱ्यांनाही 'ब्लाउसी लेक' बघून पुढे जाता येऊ शकते.)

२. 'इंटरलाकेन' या लोकप्रिय पर्यटन स्थळापासूनही बस किंवा ट्रेनने ब्लाउसीला जाणे सहज शक्य आहे.
स्वतःची गाडी असल्यास ४५ मिनिटांचा प्रवास आहे. अंतर ४० किमी.
ट्रेनने जायचे असल्यास १.३० तासांचा प्रवास आहे. Interlaken Ost east - Spiez - Frutigen (इथे ट्रेन बदलावी लागते) - Kandergrund.

**********
काही फोटो ....
.
1_0.JPG
.
2_0.JPG
.
3_0.JPG
.
4_0.JPG
.
5_0.JPG
.
6_0.JPG
.
7_0.JPG
.
8_0.JPG
.
9_0.JPG
.
10_0.JPG
.
11_0.JPG
.
12_0.JPG
.
13.jpg