बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Saturday 28 February 2015

रुक्मिणीच्या निमित्ताने

२०१३ च्या मौजेच्या दिवाळी अंकातला अरुणा ढेरेंचा 'रुक्मिणी' बद्दलचा ललित लेख काल वाचला. लेखात त्यांनी तिचे, तिच्या आयुष्याचे - आयुष्यात घडलेल्या मुख्य घटनांचे विश्लेषण, अवलोकन केले आहे. अर्थात खूप सुरेख ओघवते लिखाण आहे. हे लिखाण त्यांनी वाचलेल्या पुस्तकांचे संदर्भ देते त्याचबरोबर त्यांच्या भटकंती दरम्यान त्यांनी ऐकलेल्या कथा/दंतकथांचे पण संदर्भ देते. काही ठिकाणी त्यांनी जाणून बुजून 'रुक्मिणी' विषयी इतर बायांशी साधलेल्या संवादातून पुढे आलेली माहितीपण येते. असे हे रुक्मिणीच्या आयुष्याचे मोजमाप आहे ती सोडून इतर अनेकांच्या तराजूने तोललेले. अर्थात इथे लेखाचा मुख्य विषय रुक्मिणी असल्याने  तिचे म्हणणे काय आहे हे जाणून घेणे शक्य नव्हतेच.

पण हे असे कितीतरीवेळा आपल्या अनुभवासही येते. तुमच्या आयुष्यातली एखादी घटना, महत्वाची किंवा अगदी छोट्यात छोटी, कुठून कुणाच्या ऐकण्यात येते. ती व्यक्ती तिच्या आकलन क्षमतेनुसार, तिच्या स्वतःच्या वैचारिक बंधनांच्या तराजूत तोलून त्यावर स्वताचे एक मत तयार करते आणि अर्थात पुढे तुम्हाला माहितीहि नसलेला एक नवाच पैलू (?) तुमच्या व्यक्तिमत्वाला जोडला जातो. त्याला पुन्हा त्या व्यक्तीची त्या-त्या वेळेची मानसिक गरज, तुमच्या बद्दल मनात असलेल्या भाव-भावना यांचे एक आवरण पण चढवलेले असतेच. कधीकधी मग हे काल्पनिक जोड तुमच्या नकळत कायमस्वरूपीच बिलगून बसतात.

कधी या सगळयाची मजा वाटते, कधी राग येतो तर कधी खूप उदास व्हायला होते. मग कधीतरी असे काही वाचण्यात आले कि नुसतेच गालातल्या गालात हसू येते आणि आपलेच आपल्याला काहीतरी उमजून उगीचच हलके वाटते ..... :)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.